प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत बांधलेल्या रस्त्याची मोडकळीस अवस्था
करवंड ते कव्हळा रस्त्यावरील समस्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष ?
चिखली/(द बातमीवाला) : चिखली तालुक्यातील करवंड ते कव्हळा या सहा किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे. प्रधान मंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत 7-8 वर्षांपूर्वी या रस्त्याचे दोन कोटी रुपयांचे काम पूर्ण करण्यात आले होते. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या नाल्या शेतकऱ्यांनी बुजवून शेतवहीत केल्याने रस्त्यावर पाणी साचून राहते, परिणामी रस्ता मोडकळीस आला आहे.
नाल्यांच्या अभावामुळे रस्त्याची देखभाल दुरुस्ती कठीण झाली असून, रस्त्याचा खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या समस्येवर प्रधान मंत्री ग्रामीण सडक योजना विभागाने लक्ष देऊन रस्त्याच्या दुरुस्तीचे नियोजन करणे गरजेचे आहे. या विषयावर चिखली तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष रविंद्र डाळीमकर यांनी शासनाकडे लक्ष वेधले आहे. त्यांनी तातडीने नाल्यांचे पुनर्निर्माण करण्याची मागणी केली आहे, अन्यथा रस्त्याची अवस्था आणखी खराब होईल व शासनाने खर्च केलेले करोडो रुपये वाया जातील, असे मत व्यक्त केले. रस्त्याच्या नियमित देखभालीसाठी त्वरित उपाययोजना करण्याची गरज असून, रहदारी सुरक्षित आणि सुकर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
0 Comments