"Drowned to death" पाण्यात बुडून दोन मुलींचा दुर्दैवी मृत्यू !

नायगावात दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू

लग्नानिमित्त आल्या होत्या पाहुण्या ; तिसऱ्या दिवशी दुर्घटना



चिखली/(द बातमीवाला) : चिखली तालुक्यातील नायगाव खुर्द येथे लग्न समारंभानिमित्त पाहुण्या म्हणून आलेल्या दोन मुलींचा नदीत पेनटाकळी प्रकल्पाच्या बॅक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाला. १८ जूनच्या दुपारी दीड वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे.

राजनंदिनी निंबाजी नाटेकर (वय १०, रा. बीबी, ता. लोणार, जि. बुलढाणा) व वैष्णवी महादेव खंडारे (१७, रा. कव्हळा, ता. चिखली) अशी मृत मुलींची नावे आहेत. राजनंदिनी ही तिचे काका राजू प्रल्हाद नाटेकर यांच्या घरी नायगाव खुर्द येथे लग्नाला आली होती. तसेच वैष्णवी खंडारे हीदेखील लग्नानिमित्त आलेली होती. १६ जून रोजी नाटेकर परिवारामध्ये लग्न समारंभ उत्साहात झाला. मात्र, तीन दिवस लोटत नाही तोच दुर्दैवी घटनेत दोन मुलींचा जीव गेला. राजनंदिनी आणि वैष्णवी या दोघी नायगाव येथे गाव शिवारातील नदीवर कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. पेनटाकळी प्रकल्पाचे बॅग वॉटर मोठ्या प्रमाणावर होते. कपडे धुत असताना पाय घसरून पडल्याने दोघींचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. बराचवेळ होऊनही मुली घरी परतल्या नाहीत म्हणून नातेवाइकांनी नदीकडे धाव घेतली. त्यातच मुली बुडाल्याची माहिती मिळाली. दोन्ही मुलींना तातडीने चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. या घटनेने नाटेकर व खंडारे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून, जिल्हाभर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा अधिक तपास अमडापूर पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments